प्रतिनिधी | नाशिक / पालघर
मुंबई येथे कामानिमित्त वास्तव्यास असलेले आणि चन्नाट माणगाव येथील रहिवासी दुर्गेश विठ्ठल डांगळे यांनी महाराष्ट्रातील कमी परिचित पण अत्यंत आव्हानात्मक अशा उतवड – भास्करगड – हरिहरगड – ब्रम्हगिरी पर्वत (त्र्यंबकगड) – दुर्गभंडार – अंजनेरीगड या रेंज ट्रेकमधील तब्बल ६ किल्ले एकट्याने पूर्ण करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
दिनांक १८ ते १९ एप्रिल २०२६ दरम्यान त्यांनी हा ट्रेक पूर्ण केला. या ट्रेकमध्ये दोन जिल्हे आणि सहा किल्ल्यांचा समावेश होता. विशेष म्हणजे त्यांनी हा संपूर्ण ट्रेक सोलो ट्रेकर म्हणून पूर्ण केला.
ट्रेकपूर्वी १७ एप्रिल रोजी त्यांनी पालघर जिल्ह्यातील सिर्सोनपाडा येथे मुक्काम केला. १८ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता उतवड गडाच्या दिशेने ट्रेकला सुरुवात झाली. सुरुवातीला पायवाट सापडत नसताना स्थानिक आजीबाईंनी योग्य मार्ग दाखवला. कठीण चढाई पार करत त्यांनी उतवड गड गाठला.
यानंतर महादेव मंदिराचे दर्शन घेत त्यांनी भास्करगड सर केला. पुढे निरगुडपाडा मार्गे फणीच्या डोंगराला वळसा घालत ते सायंकाळी हरिहरगडावर पोहोचले. हरिहरगडावर त्यांनी एकट्याने नाईट कॅम्पिंग करत सूर्यास्त आणि सूर्योदयाचा अविस्मरणीय अनुभव घेतला.
दुसऱ्या दिवशी त्यांनी ब्रम्हगिरी पर्वत, गंगाद्वार उगमस्थान, दुर्गभंडार आणि शेवटी अंजनेरी गड असा प्रवास पूर्ण केला. अंजनेरी गडावर श्री हनुमानाचे दर्शन घेत त्यांनी आपल्या आयुष्यातील १०० वा सोलो गड पूर्ण केल्याची नोंद केली.
तसेच त्यांनी आतापर्यंत ४७ वेळा सोलो नाईट कॅम्पिंग केल्याचेही सांगितले. विशेष म्हणजे हा संपूर्ण ट्रेक त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला होता.
दुर्गेश डांगळे यांच्या या धाडसी आणि प्रेरणादायी मोहिमेचे ट्रेकर्स व दुर्गप्रेमींमधून कौतुक होत आहे.
— VOICE OF MAHARASHTRA NEWS


✍🏻मुख्य संपादक – सोहेल शेख
























