प्रतिनिधी : ब्युरो चीफ शमिम पठाण
देशभरात गेल्या दोन दशकांत घडलेल्या 45 मोठ्या पेपरफुटी प्रकरणांच्या अभ्यासातून धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विविध भरती आणि स्पर्धा परीक्षांमध्ये झालेल्या या घोटाळ्यांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व करिअरचे नुकसान झाले आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार,
- 45 मोठी पेपरफुटी प्रकरणे
- 1,658 जणांना अटक
- 925 जणांविरोधात आरोपपत्र दाखल
- फक्त 2 प्रकरणांत 18 जणांना दोषी ठरवून शिक्षा
- 3.86 कोटींहून अधिक उमेदवारांनी परीक्षांसाठी अर्ज केला
- फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सरासरी 183 दिवस प्रतीक्षा करावी लागली
पेपरफुटीमुळे परीक्षा रद्द होते, विद्यार्थ्यांचा वेळ, पैसा आणि मानसिक ताण वाढतो. अनेकांना पुन्हा तयारी करण्यासाठी महिनेभर मेहनत घ्यावी लागते. मात्र, दोषींना शिक्षा होण्याचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने अशा गुन्ह्यांना आळा बसत नसल्याची भावना विद्यार्थी व पालकांकडून व्यक्त केली जात आहे.

सरकारकडे गुन्हेगारांचे कॉल डिटेल्स, आर्थिक व्यवहार, सोशल मीडिया हालचाली आणि सायबर तपासासाठी सक्षम यंत्रणा असल्याचा दावा केला जातो. तरीही पेपरफुटीसारखे रॅकेट वेळेवर उघड का होत नाही? तसेच आरोपी पकडले गेल्यानंतरही अशा घटना पुन्हा-पुन्हा का घडतात? या प्रश्नांची उत्तरे आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी देशभरातून होत आहे.
पेपरफुटी हा केवळ परीक्षेतील गैरप्रकार नसून, देशातील कोट्यवधी प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणारा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे दोषींना जलद शिक्षा, पारदर्शक तपास आणि सुरक्षित परीक्षा व्यवस्था उभारणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

✍🏻मुख्य संपादक – सोहेल शेख
























